spot_img

रात्री सासरी मुक्कामी थांबला, सकाळी चाकू भोसकून केला पत्नीचा खून !

बुलढाणा, 20 मे (गुड इव्हिनिंग सिटी) ःया जगात जास्त तप्त जर काय असेल तर मनुष्याचा क्रोध आहे. क्रोधाच्या अग्नित मनुष्य काय करेल, याची कल्पना कुणीच करू शकत नाही. सासरी आलेल्या गजानन जाधवने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून क्रोधापायी तिच्यावर चाकूने सपासप वार केले. तिचा निर्घृण खून केल्यानंतर पोटच्या दोन्ही मुलींना संगम तलावात फेकले आणि स्वतःने सुद्धा उडी मारली. लोकांनी त्याला आणि मुलींना डुबण्यापासून वाचविले. पण कायद्याच्या न्यायापासून तो वाचू शकला नाही. पत्नीचा खून केल्याप्रकरणी आणि मुलींना जीवे मारण्याच्या प्रयत्न करणार्‍या गजानन विश्वनाथ जाधवला न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. वसंत भटकर यांच्या प्रभावी युक्तीवाद गजाननला अपराधी सिद्ध करण्यात महत्वाची भूमिका बजावणारा ठरला.
घटना बुलढाण्यातील संगम तलाव स्मशानभूमि परिसरातील जगदंबा नगर या झोपडपट्टी भागातील आहे. याठिकाणी राहणारे सुरेश दत्तू तायडे यांची मुलगी पूजा उर्फ गीताचा सन 2011 मध्ये जालना येथील गजानन विश्वनाथ जाधव सोबत विवाह झाला होता. दोघांना तीन मुली झाल्या. परंतु गजानन नेहमी पूजाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून दोघांमध्ये भांडणे व्हायची. नंतर नंतर पत्नीला मारहाण करून तिचा शारिरीक व मानसिक छळ करणे गजाननने सुरु केले. याला कंटाळून पूजा बुलढाण्याला माहेरी यायची. तिचे वडील सुरेश तायडे जावई गजाननला समज देवून मुलीला नांदण्यासाठी जालन्याला पाठवायचे. परंतु पुन्हा गजानन त्रास द्यायचा. नेहमीच्या त्रासामुळे पूजाने जून 2021 मध्ये पुन्हा माहेर गाठले. एक मुलगी पति गजाननकडे ठेवून श्रेया आणि श्रृती या दोन मुलींसह ती माहेरी जगदंबा नगर, बुलढाणा येथे आली. ि

चेहर्‍यावर हास्य, मनात कारस्थान घेवून बुलढाण्यात पोहोचला गजानन
कमान दीड महिन्यानंतर गजानन 8 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी पत्नीला भेटण्यासाठी जालन्याहून बुलढाण्याला आला. सासरी जेवण झाल्यानंतर त्याने रात्री मुक्काम केला. दूसर्‍या दिवशी त्याचे सासरे सुरेश तायडे, सासू सकाळीच कामानिमित्त बाहेर गेले. सकाळी 9.30 वाजेची वेळ होती. श्रेया आणि श्रृती बाहेर खेळत होत्या. पत्नी घरात एकटीच होती. गजाननच्या डोक्यात वेगळीच डाळ शिजत होती. त्याने डाव साधला. पत्नीचे आई-वडील आणि बहिण कुणीच घरी नाही.. आता हिला संपवून टाकू असा घातकी विचार गजाननच्या मनात आला. त्याने संधी शोधली आणि पत्नीला काहीच कळण्याच्या आत तिच्यावर दोन चाकूंनी सपासप वार करण्यास सुरुवात केली. डोळ्यात संतापाची आग आणि पत्नीला संपविण्याचे कारस्थान मनात असलेल्या गजाननने तब्बल 8 वार केले. पत्नी पूजा रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिला मरणासन्न अवस्थेत सोडून गजानन बाहेर पडला. बाहेर खेळत असलेल्या दोन्ही मुलींना त्याने कडेवर घेतले आणि बाजूलाच असलेल्या संगम तलावाच्या दिशेने धावत सुटला. इकडे जगदंबा नगरमधील लोकांना काही कळण्याच्या आतच गजाननने दोन्ही मुलींना घेवून तलावात उडी मारली. परंतु दैव बलवत्तर म्हणून तलावाच्या काठी असलेल्या लोकांनी गजाननसह दोन्ही मुलींचे प्राण वाचविले. इकडे जेव्हा रक्तबंबाळ अवस्थेत लोकांनी पूजाला जिल्हा रूग्णालयात आणले. परंतु प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे तिची प्राणज्योत विझली.
डूबण्यापासून वाचलेल्या गजाननने बुलढाणा शहर पोलिस स्टेशन येथे जावून पत्नीच्या खूनाची कबूली दिली.

असा झाला तपास
पीएसआय सुधाकर गवारगुरु यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून वस्तुस्थिती जाणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पंच, फोटोग्राफर, फॉरेंसिक टिम, फिंगरप्रिंग एक्स्पर्ट यांना बोलावून घटनास्थळ पंचनामा केला. घटनास्थळी रक्ताने माखलेले दोन्ही चाकू जप्त करण्यात आले. त्यानंतर मृतकचे वडील सुरेश तायडे यांनी जावई गजानन जाधव विरोधात मुलीच्या खूनाची फिर्याद दिली. गजाननवर कलम 302 व 498 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तपास अधिकारी पीएसआय गवारगुरु यांनी उर्वरीत गुन्ह्याचा तपास करून कलम 302, 307, 309, 336, 498 अ व आर्म अ‍ॅक्टचे कलम 4, 25 नुसार न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मुलींना तलावात फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हाही दोषारोपपत्रात जोडण्यात आला होता.

अ‍ॅड. भटकर यांनी तपासले 15 साक्षीदार
दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सदर खटला पुराव्याकामी लागल्यानंतर आरोपी विरूद्ध दोषसिद्धी होण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. वसंत लक्ष्मणराव भटकर यांनी 15 साक्षीदार तपासले. त्यापैकी घटनास्थळाच्या शेजारी राहणार्‍या साक्षीदार स्वाती चव्हाण, सविता सावंत, दिनकर पवार व संतोष खिल्लारे यांची साक्ष्य महत्वाची राहिली. त्यांनी आरोपीला घटनास्थळावरून जातांना पाहिले होते. तसेच मयत व आरोपी गजानन याची दहा वर्षीय मुलगी श्रृती हिने सुद्धा बापाविरोधात साक्ष दिली. एकंदरीत घटनास्थळावरून आढळून आलेली परिस्थीती व वैद्यकीय पुरावे यांची सांगड घालणारा प्रभावी युक्तीवाद अ‍ॅड. भटकर यांनी केला. आरोपीचे कपड्यावर आणि जप्त केलेल्या चाकूंवर आढळलेले रक्त तसेच फिंगरप्रिंट एक्सपर्ट यांनी एका चाकूवर आरोपीचे फिंगरप्रिंट असल्याचा अहवाल दिला होता.

न्यायालयाने ठोठावली शिक्षा
सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. वसंत भटकर यांनी आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होण्याच्या दृष्टीकोनातून प्रभावी युक्तीवाद केला. त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायाधीश -2 एस.बी. डिगे यांनी गजानन जाधवला यास भादंवि कलम 302, 307, 498 अ, 309, 336 व आर्म अ‍ॅक्टचे कलम 4, 25 प्रमाणे दोषी ठरवून कलम 302 नुसार जन्मठेप व 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास सहा महिने अधिकची सक्त मजूरीची तरतूद निकालात करण्यात आली. कलम 307 नुसार सुद्धा जन्मठेप व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने अधिकची सक्त मजुरी व भादंविची कलम 498 अ नुसार तीन वर्षे सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना अधिकची सक्त मजुरीची शिक्षा तर आर्म्स अ‍ॅक्टचे कलम 4, 25 नुसार सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा व 500 रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना अधिकची साध्या कारावासाची शिक्षा अशा प्रकारे सर्व शिक्षा आरोपीस एकत्रीत भोगावयाचा मोठा निकाल न्यायालयाने दिला. सदरचा खटला यशस्वी होण्यासाठी तत्कालिन तपास अधिकारी पीएसआय सुधाकर गवारगुरु, एएसआय फिंगरप्रिंट एक्सपर्ट रामेश्वर गाढवे तसेच कोर्ट पैरवी अधिकारी एएसआय किशोर कांबळे यांनी पूर्णपणे सहकार्य केले.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत