पंचनामे करून नुकसान भरपाई द्या…अन्यथा आक्रमक आंदोलन करणार : रविकांत तुपकर
बुलढाणा, ११ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : जिल्ह्यातील खामगाव व शेगाव तालुक्यात ७ जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे हजारो हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याने शेतीचे व शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे व घरातील समान वाहून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. या झालेल्या नुकसानीची आज १० जुलै रोजी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी पाहणी केली. त्यामध्ये त्यांनी शेगाव तालुक्यातील जवळा बु., जवळा पळसखेड व खामगाव तालुक्यातील कोलारी, पिंप्री गवळी गावात भेटी देवून नुकसानग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या व त्यांना धीर दिला. सरकार शेतकऱ्यांप्रति असंवेदनशील आहे, असा आरोप रविकांत तुपकर यांनी केला असून नुकसानग्रस्तांना १००% भरपाई द्या, अन्यथा नुकसानग्रस्तांना घेवून आक्रमक आंदोलन करू, असा इशारा देखील दिला आहे. रविवार ७ जुलै रोजी संपूर्ण जिल्हाभरात जोरदार पाऊस झाला. विशेषतः घाटाखालील खामगाव आणि शेगाव या दोन तालुक्यांमध्ये ढगफुटी झाल्याने नद्यांना पूर आला. यामुळे हजारो हेक्टर शेतजमीन पिकांसह खरडून गेली. अनेक गावांमध्ये घरांची पडझड होवून, घरातील अन्नधान्य व साहित्य वाहून गेले. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. दरम्यान रविकांत तुपकर यांनी १० जुलै रोजी नुकसानग्रस्त भागात पोहोचून नुकसानीची पाहणी केली. शेगाव तालुक्यातील जवळा बु., जवळा पळ- सखेड व खामगाव तालुक्यातील कोलारी व पिंप्री गवळी यासह इतर गावांमध्ये पाहणी करून त्यांनी नुकसानग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या व नुकसानग्रस्तांना धीर दिला. तसेच जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याशी संवाद साधून तातडीने पंचनामे करून १००% नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. तर ज्यांचे संसार उघड्यावर आले आहे त्यांची तातडीने व्यवस्था करण्याची देखील विनंती तुपकरांनी प्रशासनाला केली आहे. तीन दिवस झाले तरी नुकसानग्रस्तांना सानूग्रह अनुदान देण्यात आले नाही, ही शोकांतिका आहे. सरकार असंवेदनशीलपणे वागत असून शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून १००% नुकसान भरपाई दिली नाही तर नुकसानग्रस्तांना घेवून आक्रमक आंदोलन करू, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.