तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस; तुपकरांची तब्येत प्रचंड खालावली!
बुलढाणा, ७ सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या ४ सप्टेंबरपासून सिंद- खेडराजात सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. पोटात अन्नाचा कणही न घेतल्यामुळे रविकांत तुपकर यांची तब्येत आज प्रचंड खालावली आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण ५० पेक्षा कमी झाल्याने तुपकर हाइपोग्लाइसीमियामुळे पुढच्या काही तासांत कोमात जाऊ शकतात असे वैद्यकीय तज्ञांचे म्हणणे आहे. सरकारच्या वतीने काल ता.६ सप्टेंबर रोजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी रविकांत तुपकर यांच्याशी फोन वरून चर्चा केली, उपोषण मागे घेण्याची विनंती केली, मात्र जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्यांचे लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत माघार नाहीच अशी भूमिका तुपकर यांनी घेतली आहे. दरम्यान आता हे आंदोलन चांगलेच चिघळण्याची चिन्हे असून शेतकऱ्यांच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. उद्या, ८ सप्टेंबरला रविकांत तुपकर यांच्या समर्थनार्थ राज्यात चक्काजाम आंदोलन होणार आहे, शिवाय ९ सप्टेंबर रोजी समृद्धी महामार्गावर बैलगाड्या घेऊन घुसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. सोयाबीन कापसाची दरवाढ, पिकविम्याची रक्कम, अतिवृष्टीची नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला कंपाऊंड यासह विविध मुद्यांवर रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा वणवा आता गावागावात पेटत आहे. गावागावात प्रभातफेऱ्या, ग्रामसभांचे ठराव याद्वारे तुपकर यांच्या आंदोलनाला समर्थन वाढत आहे. आंदोलनाच्या चौथ्या दिवशी तुपकर यांची प्रकृती अधिकच खालावत चालली आहे. तुपकर मागण्यांसंदर्भात ठोस निर्णयावर ठाम आहेत. रक्तातील साखरेचे प्रमाण ५० पेक्षा कमी झाल्याने तुपकर यांना हाइपोग्लाइसीमिया होण्याचा धोका वाढला आहे. ज्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यास रविकांत तुपकर पुढच्या काही तासांत कोमात जाऊ शकतात.