मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशाल नरवाडे यांच्या कार्याचा गौरव
बुलढाणा, 28 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा तालुक्यातील सावळी येथील भुमिपुत्र विशाल तेजराव नरवाडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार धुळेहे राज्यातील उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी ठरल्यामुळे बुलढाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्या गेला आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेचे सीईओ असतांना त्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. यामध्ये कॉपीमुक्त अभियान आणि लेट येणार्या कर्मचार्यांना धडा शिकविण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषेदेचे गेट बंद करून आपल्या कामाचा ठसा उमटिवला होता. आता सुध्दा धुळे जिल्हा परिषदेमध्ये उत्कृष्ट काम त्यांनी केले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यात 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याची धुळे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी या आराखड्यातंर्गत राबविलेल्या विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांबद्दल ते राज्यातील उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले असून याबद्दल त्यांचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
100 दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत काल (दि.27) पार पडली. यावेळी राज्यातील 15 विविध विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय, महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदांमध्ये या आराखड्यातंर्गत सुरु असलेल्या उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद गटात सादरीकरणाची संधी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी मिळाली. श्री. नरवाडे यांनी केलेल्या कामकाजाचे उत्कृष्ट सादरीकरण केल्याने ते राज्यातील उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले असून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या सादरीकरणात सात कलमी कार्यक्रमाबरोबरच विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण श्री. नरवाडे यांनी केले. जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ तयार करण्यात धुळे जिल्हा परिषद राज्यात चौथ्या तर नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहे. यामुळे ग्रामविकास विभागाच्या 7 सेवा ऑनलाईन प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. सुकर जीवनमान अंतर्गत सेवांची पोहोच सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्रामीण भागात राहणीमान सुलभ करण्यासाठी 9 उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यालयीन स्वच्छता उपक्रमांतर्गत स्वच्छतेची पंचसुत्री तयार करण्यात येऊन जुन्या निरुपयोगी वस्तुंची विल्हेवाट लावण्यात आली आहे. तक्रार निवारण उपक्रमातंर्गत आपले सरकार पोर्टलवरील 349 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. अभ्यागत भेटीचे नियोजन, नागरीकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. कार्यालयीन सोईसुविधा उपक्रमातंर्गत कार्यालयाच्या आवारात स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छ प्रसाधनगृह, सुसज्ज प्रतिक्षालय, प्रथमोपचार पेटी, दिव्यांग अभ्यागतांसाठी व्हीलचेअर, कार्यालयाचे सौंर्दयीकरण करण्यात आले आहे.
आठवड्यातून किमान 2 दिवस क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देऊन पाहणी करण्यात येते. प्रशासकीय कामकाजात ई-ऑफिस प्रणालीचा वापर सुरु केला आहे. यामुळे कामकाजास गती आली आहे. आर्थिक व औद्योगिक गुंतवणूकीस प्रोत्साहन उपक्रमातंर्गत उद्योगांना पोषक वातावरण तयार करण्यात येत आहे. त्यासाठी लागणार्या परवानग्या, नोंदणी, कर भरण्याची सुलभता पध्दत सोपी करण्यात आली आहे. अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी व कृत्रिम बुध्दीमत्ता व तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात आला आहे. शिवाय कॉपी मुक्त अभियानाचा धुळे पॅटर्न राज्यभरात नावारुपास येत असून या उपक्रमाचे शिक्षणमंत्री, मुख्य सचिव तसेच शिक्षण आयुक्त यांनीही कौतुक केले आहे. याबद्दल विशाल नरवाडे यांचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह त्यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील विविध स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.