बुलढाणा, 29 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) : महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराची तुलना औरंगाजेबाच्या राजवटीशी केल्या नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर ही निशाण साधला आहे. 31 तारखेच्या आत पीक कर्जाचे पैसे भरा, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटलं आहे. त्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे चांगले संतापल्याचे दिसले आहे. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लाज काढली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या सोशल मिडीया पोस्टवर म्हटले आहे की, “हे बोलताना ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज शरम वाटते. जनतेने राक्षसी बहुमत देऊन सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू वागू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन महायुतीने राज्यातील शेतक-यांची मते घेतली आणि सत्तेवर येताच 31 मार्च पूर्वी पीक कर्ज भरा, कर्जमाफी मिळणार नाही असे मुजोरपणे सांगत आहेत.लाडक्या बहिणींची फसवणूक अगोदरच केली आहे. 2100 चे आश्वासन देऊन त्यांच्या हातावर 1500 रुपये टेकवले जात आहेत. विविध कारणे देऊन 10 लाखांहून अधिक महिलांना अपात्र करून योजनेचा लाभ बंद केला आहे आणि 2100 रुपये मिळण्यासाठी 5 वर्ष वाट पहावी लागेल असे उद्दामपणे सांगत आहेत”
याचे कारण ठरले ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील माळेगावच्या शेतकरी मेळाव्यातले भाषण, सगळी सोंग करता आली तरी पैशांचं सोंग करता येत नाही, असंही त्यांनी म्हंटलं आहे. यावर पुढे बोलताना अजितदादा म्हणाले की, आम्ही अर्थसंकल्प हा वास्तववादी भूमिका घेऊन सादर केलान् आहे. मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो, मला थोडीशी तरी अक्कल आहे. सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही. काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफी बाबत वक्तव्य केले होते. पण मी राज्यातल्या जनतेला सांगतो 31 तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा. जे आधी सांगितलं होतं, ते प्रत्यक्षात येत नाही. आता तशी परिस्थितीही नाही. भविष्यात परिस्थिती पाहून आम्ही निर्णय घेऊ. या आणि पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही, तशी आपली परिस्थिती नाही, असं स्पष्टपणे अजित पवार यांनी यावेळी सांगितलं आहे.