बुलढाणा, 29 जून (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) :‘व्यवहाराचा काळा घोडा’ मराठी साहित्याच्या शिखरावर आपल्या साहित्य प्रतिभेने घेवून जाणारे प्रख्यात साहित्यीक अजीम नवाज राही जन्माने मुस्लिम आहेत. शिक्षण उर्दूतून झाले. घरी उर्दू-हिंदी बोलली जाते. त्यामुळे हिंदीच्या सक्तीबाबत त्यांची भूमिका नेमकी काय? हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना आहे. गुड इव्हिनिंग सिटीने त्यांच्याशी याबाबत मत जाणून घेतले असता, कवी अजीम नवाज राही यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. हिंदी सक्तीचा निर्णय अन्यायकारक असून या निर्णयाचा राज्य शाासनाने पुनर्विचार करावा, अशी प्रतिक्रिया श्री राही यांची आहे. ते म्हणतात की, पूर्वी हिंदी होती पण पाचव्या वर्गापासून होती. परंतू त्रिसूत्री भाषीय निर्णय लादण्याचा जो प्रयत्न आहे. तोपर्यंत अत्यंत चुकीचा आहे. खरं म्हणजे मराठी ही संवाद व्यवहाराची भाषा नसून जीवन व्यवहाराची भाषा आहे. मराठी विषयीचा अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त करतांना ते म्हणाले की, मी माझ्या कातडीची पादत्राणे करून जरी मराठीच्या पायात घातली तरी तिचे उपकार फिटणार नाही. अशा पद्धतीचं ज्वारीच्या भरदार कणसासारखं दान माय मराठीने माझ्या शब्द यात्रेच्या पदरात टाकले. साखरखेर्डाच्या मोहल्ल्याच्या एखाद्या कोपर्यामध्ये माझं घर आज पर्यंत कितपत पडलं असतं परंतु माय मराठी मुळे, कवितेमुळे मी कुठं राहतो.. माझा मोहल्ला कुठे आहे.. ते मराठीत दाखवण्यात दाखवण्याचं जे महत्त्वाचेकार्य केलं त्याबद्दल मला माय मराठी विषयी सार्थ अभिमान आहे. मला महानगरीय लखलखाटमध्ये कधी वक्ता, कधी निवेदक करून घेऊन जाते हे मराठीचे अनंत उपकार आहे. मी माझं मनोगत व्यक्त करत असतांना अनेक वेळा कवीवर्य करीम खान यांच्या ओळी सांगतो की, “मुखी माझी या गोड वाणी मराठी, मला शोधण्याची निशाणी मराठी, जरी मातृभाषा मराठी ना माझी उभ्या जीवनाची कहाणी मराठी”. कवि राही स्पष्ट म्हणाले की, मराठी इथल्या वार्यांमध्ये आहे. इथल्या झाडांमध्ये आहे. पाखरांच्या किलबिलाटामध्ये आहे. झर्यांच्या वाहण्यात आहे. मराठी अस्तित्वाला धोका निर्माण करण्याचा हा जो प्रयत्न आहे, तो अन्यायकारक आहे. या निर्णयाचा पहिल्या वर्गापासून हिंदी अनिवार्य करण्याचा जो राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा. अर्थात माय मराठी कधी संपणार नाही..कारण अनादिकाळापासून तिची जी मुळं आहेत ,ती खोलवर रुजलेली आहे.खरं म्हणजे
ही ओळखी निशाणी मराठी मुळे मिळाली
मज माणसे दिवाणी मराठी मुळे मिळाली
गीष्मा समान होतो मी कोरडा
परंतु ओठात चिंब गाणी मराठीमुळे मिळाली,
या काव्य ओळींनी कवी अजीम नवाज राही यांनी मराठीची महती सांगितली.
Good Evening City