बुलढाणा, १४ फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) ः तीन दिवसांपूर्वी भारत विद्यालयातील आठव्या वर्गात शिकणार्या नमन अरूण राऊत या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. इतक्या लहान वयात कोणी कसे काय आत्महत्या करू शकते, या धक्क्यातून पालक वर्ग अजूनही सावरलेला नसतांना आणि नमनच्या चितेची आग शांत झालेली नसतांनाच त्याच्याच वर्गातील आणि त्याच्याच सोबत असणार्या अथर्व वैभव राणे नावाच्या नमनच्या वर्गमित्राने थोड्या वेळापूर्वी आत्महत्या केली आहे. या दूसर्या घटनेने आता मोठी खळबळ उडवून दिली आहे. या दोन्ही आत्महत्यांचे एकमेकांशी काही कनेक्शन आहे का? या दोघांना कुणी ब्लॅकमेल तर करत नव्हते, असे प्रश्न उपस्थित होत आहे. सुंदरखेड येथील पाण्याच्या टाकीजवळ अथर्व राहत होता. त्याचे वडील वैभव राणे हे कारागृह पोलिस आहे. नेहमीप्रमाणे अथर्व आज शाळेतून घरी परतला. सायंकाळी ५ वाजेदरम्यान त्याने गळफास लावला. ही घटना कुटूंबातील कुणीतरी पाहील्यानंतर त्याला तातडीने फासावरून उतरविण्यात आले. त्याच्यात धाकधूक होती, असे त्याच्या निकटवर्तीयांकडून कळते. त्याला तातडीने एका खाज
गी हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतु त्याला वाचवू शकले नाही. १४ वर्षीय अथर्वचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आला आहे. ज्यांना ज्यांना ही गोष्ट प्रथम समजली, त्यांना धक्का बसला आहे. कारण नमन राऊत याच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नाही. तोच त्याचाच मित्र तीन दिवसांनी आत्महत्या करतो, हे अनाकलनीय आहे. पोलिसांनी याच्या मुळाशी जाणे गरजेचे असून या दोघांच्या आत्महत्येमागे मुख्य धागा कुठला ? हे पाहणे अत्यंत गरजेचे झाले आहे.



