सतिश पवारांना मिळेल लोकसभा निवडणूकीची ‘पॉवर’ ?

बुलढाणा, २१ मार्च (गुड इव्हिनिंग सिटी / रणजीतसिंग राजपूत): परवाच्या अॅड. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला पाठविलेल्या 'लेटर बॉम्ब' ने राजकीय खळबळ उडवून दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढेल, अशा चर्चांना उधाण आले आहे. अशात वंचितचा बुलढाणा लोकसभेचा चेहरा कोण ? या प्रश्नाला जिल्हाभरातून काही नांवे उत्तर म्हणून समोर येवू शकतील. त्यात एक नांव म्हणजे वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतिश पवार यांचे आहे. याचे कारण म्हणजे त्यांच्या संदर्भात मागील तीन दिवसांपासून सोशल मिडीयावर त्यांच्या समर्थकांकडून 'खासदारकी लढणार आणि जिंकणार..', अशा पोस्ट फिरविल्या जात आहे. स्वतः पवारही इच्छूक असल्याचे समजते. परंतु वंचितचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर हे इंडीया आघाडीत सहभागी होतात की नाही ? यावर वंचितची लोकसभा रणनिती ठरणार आहे. परंतु सतिश पवार यांच्या पोस्टने मात्र चांगलाच धुराळा ? उडाला असून वंचितची बुलढाणा लोकसभेच्या रणांगणात संभाव्य एन्ट्रीच्या कल्पनेने महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाच्या उकळ्या फूटत आहे. सामाजिक कार्यात नेहमीच झोकून देऊन काम करणारे सतीश पवार यांनी आपल्या कार्यकुशलतेने जनतेच्या मनाचा ठाव घेतला. सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य लोकांच्या समस्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून सोडविल्या. जनतेला न्याय देण्याच्या भूमिकेतून वेळप्रसंगी अधिकाऱ्यांशी त्यांच्याच प्रशासकीय भाषेत युक्तिवाद करून प्रश्न हाताळले आणि त्यांची सोडवणूकही केली. आपले तुणतुणे वाजविणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांना आपल्या खास स्टाइलने वठणीवर आणून जनतेला न्याय दिला. हाती कोणतीही सत्ता सुत्रे नसताना हा कार्यकर्ता एवढ्या ताकदीने पुढे जात आहे, मग तो लोकसभेत गेला तर जिल्हावासियांना निश्चितच फायदेशीर ठरेल, अशी अपेक्षा ठेवत 'सतीशदादा, तुम्ही लोकसभा लढवाच, निवडून आणण्याची जबाबदारी आमची', असा निर्धार करत जनतेने त्यांच्याकडे खासदारकीची निवडणूक लढण्याचा रेटा धरला असून, तशी चर्चा होत आहे. ज्या जात प्रवर्गातून ते येतात, त्या प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने ती मते निर्णायक ठरू शकतात, हीदेखील चर्चा यानिमित्ताने होत आहे. विद्यार्थ्यांसाठी काढलेला एल्गार मोर्चा, ठिय्या आंदोलने, टॉवर आंदोलन तसेच शासन आपल्या दारी कार्यक्रमात दिलेले विद्यार्थ्यांचे एक लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन हे युवा वर्गाला विशेष भावले. तसेच अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या हजारो प्रकरणांसंदर्भात त्यांनी केलेले आंदोलन हे कक्षेबाहेरचे असल्याने लोकांच्या कायम स्मरणात राहिले. त्यांच्या आंदोलनाची न्यायालयाने दखल घेत न्यायाधीशांची रिक्तपदे भरण्यात आली. जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांवर केलेली निलंबनाची अन्यायकारक कारवाई मागे घ्यायला प्रशासनाला भाग पाडले. या आंदोलनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या मनात सतीश पवार यांच्याबद्दल आदराचे एक वेगळे स्थान निर्माण झाले. अनेक प्रस्थापित सावकारांच्या जबड्यातून त्यांनी गरिबांच्या जमिनी सोडवून आणल्या. एवढेच नाही तर सावकार व त्यांच्या गुंडांवर कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यास यंत्रणेला भाग पाडले. अशा अनेक विधायक कामांमुळे पवार लोकप्रिय नेत्यांमध्ये गणले जात आहेत. कुठलाही राजकीय वारसा नसतांना स्वकर्तृत्वाने त्यांनी लोकांच्या मनावर आपली छाप पाडली आहे. त्यांच्या नेतृत्वात बुलढाण्यामध्ये काही दिवसांपूर्वी विविध देशातील भिक्खूंच्या उपस्थितीमध्ये जागतिक धम्म परिषद पार पडली. या धम्म परिषदेची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली. त्यांची शिस्त आणि नियोजनबद्धता ही कायमच लोकांच्या मनावर कोरली आहे. सद्यस्थितीत लोकसभेसाठी ज्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे, ते सर्व 'मराठा' आहेत. सतिश पवार यांनी वंचितकडून निवडणूक लढविली तर ते अल्पसंख्यक आणि बौद्ध समाजाची मते मिळवू शकतात; जो आकडा निर्णायक विजयाचा ठरू शकतो, असे पवार यांचे समर्थक गणितही मांडत आहेत. अर्थात आधी युतीचा निर्णय मग जागा वाटपाचा आणि नंतर उमेदवारीचा.. परंतु सतिश पवार लोकसभा निवडणूकीसाठी मुठ आवळून, कंबर कसून तयार आहेत, हे मात्र खरंय !