आशिर्वादाचे धनी व्हा, नका होऊ पापाचे वाटेकरी !
बुलढाणा, १२ डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी / अजय काकडे) : खरंतर शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. प्रत्येकाच्या ताटातल्या अन्नाचा कण ना कण हा शेतकऱ्याच्या घामातून, रक्ताच्या थेंबातून तयार होतो. मात्र याच बळीराजाला काही क्षुल्लक कारणावरून कुठे सुड्या जाळल्या जातात हे तर कुठे उभ्या हरभऱ्यात तणनाशक फवारत आहे. हा प्रकार अतिशय खेदजनक आहे. काळ्या आईची केलेली ही क्रूर थट्टा आहे. घामाने पिकवलेल्या सोन्याची राखरांगोळी करणाऱ्या विकृत प्रवृत्तींनी जिल्ह्यात अनेक दिवसांपासून कोणाची सुडी जाळली, तर कुठे मत्सरातून पिकांमध्ये तणनाशक फवारले जात आहे. समाजातील समाजकंटकाना नेमके झाले तरी काय, शेतकरी आपल्या घामातून शेतात सोनं पिकवत असतो. पण समाजातील बोटावर मोजणाऱ्या लोकांना त्यांची प्रगती ही डोळ्यात खुपते की काय असं म्हणल तर वावग ठरणार नाही. सुड्या जाळण्याचा प्रकार सुध्दा अनेक ठिकाणी बघायला मिळाला. यातून त्यांना कुठले समाधान मिळत असावे एखाद्याचे स्वपनाभंगवतांना, मोठ्या मेहनतीने शेतकरी आपल्या लेकरा बाळा प्रमाणे पीकांना जपत असतो. स्वतः पेक्षाही तो पिकाचे संगोपन करतांना बघायला मिळतो. शेतात पेरणी केल्यानंतर त्या पिकांना जीव लावतांना बघायला मिळतो. त्यांची काळजी घेण्यासाठी घाम गाळतो अन् त्यांतून हिरवीगार शाल शेतात पांगरते, पण हीच हिरवीगार शाल अपप्रवृत्तीच्या डोळ्यात खुपतांना बघायला मिळत आहे. त्यावर तणनाशक फवारून होत्याच नव्हत करून टाकत आहे. बळीराजाच्या वाईटावर टपलेल्या काही विकृत प्रवृत्तींनी कटकारस्थान रचून हरभऱ्याच्या शेतात तणनाशक फवारले. बुलढाणा तालुक्यातील उमाळा येथील शेतकरी प्रदिप चितंगराव सपकाळ यांच्या एक एकर हरभरा पेरलेल्या शेतात पाच-सहा दिवसापूर्वी अज्ञात इसमाने तणनाशक फवारत हरभरा पीकाचे नुकसान केले आहे. अज्ञात इसमा विरूध्द तक्रार दाखल करण्यात आली आहे. उमाळा येथील शेतकरी प्रदिप चितंगराव सपकाळ यांच्या शेतात हरभरा पिकाचा पेरा केला आहे. त्याला दीड-एक महिन्याचा कालावधी झालेला आहे. त्यांच्या शेतातील हरभरा पिका बरोबरच तण हि पिवळे पडून ते सुकतांना दिसले. परंतू त्यांना वाटले की उबळ लागलेली असावी पण हरभरा पिका बरोबरच तण ही सुकत असल्याने त्यांना समजले की अज्ञात कोणी तरी इसमाने त्यांचे नुकसान व्हावे या हेतूने शेतामध्ये तणनाश्क फवारले यामुळे त्यांच्या एक एकर शेतातील हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. यात अंदाजे दहा हजार रूपयाचे नुकसान झालेचे तक्रारीत म्हटले आहे. प्रदिप चितंगराव सपकाळ यांनी बुलढाणा ग्रामीण पोलिस स्टेशन मध्ये अज्ञात आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यासंबधीचा पुढील तपास पोलीस करत आहे. तरी अज्ञात आरोपीचा लवकरात लवकर शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी होत आहे. एकमेकांवर राग काढण्याच्या नादात आपल्या घामाने पिकवलेल्या मोत्याच्या दाण्यांची अशी राखरांगोळी करू नका. शेतकरी बांधवानी पिकवलेला घास कोणाच्या तरी मुखात जाईल आणि त्याच्याकडून आशीर्वाद मिळेल. त्या अशीर्वादाचे धनी व्हा, पापाचे वाटेकरी होऊ नका.