
माजी आमदार व अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांनी मैत्रीपूर्ण लढत होईल असे ट्विट केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काही तासापूर्वीच त्यांनी ट्विट करून एक्सवर याबाबत संकेत दिले यामध्ये “महाराष्ट्रात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत !!! बुलढाणा लोकसभा मतदारसंघात ?”. बुलढाण्याची जागा काँग्रेसला सोडावी यासाठी जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. त्यांनी महाराष्ट्र प्रदेशचे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि यशोमती ठाकूर यांची भेट घेतली होती. सतत काँग्रेसकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या उमेदवारीबाबत चर्चा रंगत होती. त्यांनी इच्छा व्यक्त केली होती “मला जसं बुलढाण्याच्या लोकांनी आमदार केलं तसे एक दिवस मला बुलढाण्याचे लोक खासदार करतील” अस मत ही सपकाळ यांनी व्यक्त केले होते. त्यांनी फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले होते की “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त ” यामुळे महाविकास आघाडीचे काय होणार ? हे लवकरच कळेल. …तर काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात खटके उडत असल्यामुळे काही जागांवर दोन्ही बाजूंनी उमेदवार उभे करण्यात येत आहेत.. यामध्ये मुंबई, भिवंडी, सांगली या जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत काँग्रेस नेत्यांन कडून दिले जात आहे. जर असे झाले तर बुलढाण्यातही काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढेल.. याबाबत सपकाळ यांनी तयारीही केली आहे. या संदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी गुड इव्हिनिंग सिटीने संपर्क केला असता ते म्हणाले की, सांगली आणि मुंबईच्या काही भागात जशी मैत्रीपूर्ण लढत उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये होत आहे तशीच मैत्रीपूर्ण लढत बुलढाणा या ठिकाणी घ्यायला काय हरकत आहे ? जिल्हा काँग्रेस तयार आहे, कार्यकर्ते तयार आहेत आणि मी सुद्धा सज्ज आहे.. जर पक्षाने याबाबत काही भूमिका घेतली तर बुलढाण्यातून नक्कीच उमेदवारी अर्ज दाखल करणार”, असे स्पष्ट प्रतिपादन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.