राहुल गांधी ब्रिगेडच्या या चेहऱ्याला उमेदवारी मिळाली तर नवल वाटायला नको

बुलढाणा, १९ मार्च (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) : महाविकास आघाडीकडून बुलढाणा लोकसभेसाठी अद्यापही उमेदवारी घोषित नसल्यामुळे नव्या नावांसह नवनवीन चर्चा रोज चर्चील्या जात आहे. तसे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची खासदारकी लढविण्याची चर्चा जुनीच आहे, तरी ती दोन दिवसांपासून नव्या गतीने यासाठी चर्चीली जात आहे की, जर बुलढाणा लोकसभेसाठी राहुल गांधी यांनी सपकाळ यांच्यासाठी आग्रह धरला तर महाविकास आघाडीकडून हर्षवर्धन सपकाळ यांची उमेदवारी निश्चीत केली जाईल आणि राजनितीक विश्लेषकांना ‘जोर का झटका’ धीरे से लागू शकतो. कारण आज दिल्लीसाठी रवाना झालेले सपकाळ उमेदवारी घेवूनच परत येतील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटत आहे. याला बळ देणारी गोष्ट म्हणजे सुत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस आणि उबाठामध्ये रामटेक आणि बुलढाणा या दोन जागांना घेवून तिढा आहे. रामटेकसाठी उबाठाने होकार भरला तर बुलढाणा काँग्रेसला सुटण्याची दाट शक्यता आहे. लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहिर झाल्यानंतर माजी आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव हर्षवर्धन सपकाळ यांनी आता दंड थोपटले आहे. माझी तयारी पूर्ण लवकरच पक्षश्रेष्ठींशी उमेदवारी संदर्भात बोलणी करणार असल्याचे भाष्य केले होते. महाविकास आघाडीत बुलढाणा मतदार संघ शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वाट्यावर येतो.. ठाकरे गटाकडून प्रा. नरेंद्र खेडेकर कंबर कसून आहेत. तर शरद पवार यांच्याकडून रविकांत तुपकर यांना उमेदवारी द्यावी अशी शिफारस करण्यात आली आहे. उद्या, २० मार्च रोजी उध्दव ठाकरे बुलढाणा लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे उद्या कोणाची उमेदवारी जाहिर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानांच हर्षवर्धन सपकाळ यांच्या एंट्रीने ही वातावरण तापले आहे. परवापासून त्यांच्या असंख्य समर्थक कार्यकर्त्यांनी ही सोशल मिडीयावर पोस्ट करत ‘दिल्ली गाठायचीच’ अशा पोस्ट व्हायरल करायला सुरूवात केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना २०१४ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये उमेदवारी मिळणार नाही असा ठाम विश्वास त्यांच्याच पक्षातील स्थानिक नेत्यांकडून व्यक्त केला जात होता. पण त्यांनी तिकीट ही आणलं, राहुल गांधींना ही बुलढाण्यात आणलं आणि आमदारही झाले. त्यामुळे त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागतली तर त्यांना ती मिळू शकते, हा आत्मविश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. राहुल गांधीचे विश्वासू सहकारी म्हणूनच त्यांना ओळखले जाते. एक दीड वर्षापूर्वी त्यांची पुन्हा काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव पदी व पंजाबच्या प्रभारीपदी निवड झाल्यानंतर बुलढाण्यात त्यांचा सत्कार ठेवण्यात आला होता. त्यावेळेस ते बोलतांना म्हटले होते की ‘मला एकदा बुलढाण्याचा खासदार व्हायचयं.. ‘त्यांनी जी इच्छा व्यक्त केली होती ती पूर्ण करण्याची वेळ जरूर आली पण त्यांना उमेदवारी मिळणार का हा मोठा प्रश्न आहे. विशेष म्हणजे मागील महिन्यात संसदीय बोर्डाच्या बैठकीच्या वेळी खा. संजय राऊत यांनी स्वतःहून सपकाळ यांना लोकसभा लढण्याविषयी विचारणा केली होती. पण ‘काँग्रेसने तिकीट दिले तर लढू’, असं सपकाळांचे उत्तर होते. अर्थात हर्षवर्धन सपकाळांचा जिल्ह्यातील प्रभाव उद्धव ठाकरे जाणून आहेत, यात शंका नाही. तर ‘एक भला माणूस’ म्हणून त्यांचा नावलौकिक जनता जाणून आहे. लोकसभा काँग्रेसने लढवावी, असे ठराव यापूर्वीच जिल्हा काँग्रेस कमिटीने पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द केलेले आहे. पक्षनिरीक्षकांनी नोंदी घेतलेल्या आहेत आणि २००९ पासूनचा काँग्रेसचा खासदारकीचा वनवास संपावा, अशीही तिव्र भावना सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे. काँग्रेसकडून लोकसभा लढणाऱ्या इच्छूकांमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अॅड. जयश्रीताई शेळके, श्याम उमाळकर, राहुल बोंद्रे, दिलीपकुमार सानंदा अशी नांवे देण्यात आली होती. त्यात सपकाळ यांचे नांव सर्वात आघाडीवर होते. हर्षवर्धन सपकाळ जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहिल्याने त्यांना जिल्हाभरातील गावांची खडा न खडा माहिती आहे. प्रत्येक गावांत कार्यकर्त्यांचे जाळे आहे. संग्रामपूर व जळगांव जामोद या तालुक्यातील आदिवासींच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले कार्य सर्वश्रुत आहे. वकाणा या गावाला त्यांनी आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त करून दिला. स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून त्यांनी त्या भागांत मोठं काम हाती घेतलं होतं. त्यामुळे बहुतांश भागात त्यांचा चांगलाच वकूब आहे. दिल्लीच्या वातावरणात ते १५ वर्षांपासून पक्षाचं काम करतात. त्यामुळे त्यांना दिल्लीचं वातावरण चांगलच मानवंत. हिंदी भाषेवर त्यांची चांगली पकड आहे. नवनवीन प्रयोग राबविण्यात ते अग्रेसर असतात. दिल्लीची नस माहित असल्याने त्यांच्या लोकसभा मतदारसंघाला फायदा होईल असं त्यांचे हितचितंक सांगतात. महत्वाची बाब म्हणजे सपकाळ यांनी स्वतःहून तिकीटासाठी अद्यापपर्यंत प्रयत्न केलेले नाहीत. ‘राहुलजींनी आदेश दिला तर लढेन’, अशीही भूमिका त्यांची आहे. सपकाळ यांच्यासाठी ‘एडी चोटी का जोर’ लावणारे दिल्लीतही आहेत. राहुल गांधींशी हर्षवर्धन सपकाळ यांचे असलेले सख्य पाहता तिकीटाच्या वाटपात ‘उथलपुथल’ झाल्यास आश्चर्य वाटायला नको. गल्लीपेक्षाही जास्त दिल्लीत वजन असलेल्या हर्षवर्धन सपकाळ हे आपलं वजन वापरून तिकीट आणतील का? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे.