spot_img

याचा बाप, त्याचा बाप !

सध्या महाराष्ट्र राज्यात वाचाळविरांची कमी नाही. कुणीही मनाला येईल तसे बोलुन घेतोय. असे बोलघेवडे नेते कमी अधिक प्रमाणात सर्वच पक्षात आहेत. फरक फक्त एवढाच आहे की काहींना वरुन आदेश आल्याशिवाय त्यांचे तोंड उघडत नाही आणि काहीसांठी काही असलं नसलं तरी तोंड बंद होत नाही. बरं हा शाब्दीक हल्ला शत्रु पक्षावर म्हणजेच प्रतिस्पर्धी पक्षातील नेत्यांसाठी असला तर वाहवाही होते पण मित्रपक्षांसाठी असला तर आतल्याआत धुसफुस सुरु राहते. महाराष्ट्रात राणे कुटूंबाला ओळखणार नाही असा कोणी शोधुनही सापडणार नाही असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शिवसेनेचे विरोधी पक्षनेते, मग मुख्यमंत्री, काँग्रेसमध्ये कॅबीनेट मंत्री आणि आता भाजपच्या वळचणीला बसलेले नारायण राणे हे सर्व महाराष्ट्राला ज्ञात आहेत. पुर्वी घराणेशाहीवर बोट ठेवणार्‍या नारायण राणेंनी आपल्या दोन्ही पुत्रांना राजकारणात स्थिरस्थावर केलंय. शिवसेना, काँग्रेस, मग भाजपा असे प्रवास करुन नारायण राणे सध्या केंद्रात मंत्री आहेत तर वडीलांसोबत नितेश राणेंनी सारखाच पक्षप्रवास करुन ते सध्या महाराष्ट्रात मंत्री आहेत. राणेंचे दुसरे पुत्र निलेश राणे यांचाही पक्षप्रवास येवढाच आहे मात्र यंदाच्या विधानसभेत ते शिवसेना शिंदे गटाकडुन कुडाळचे आमदार आहेत. नारायण राणे आपल्या बेधडक वक्तव्यासाठी प्रसिध्द होते. त्यांनी शिवसेनेत असतांनाची बरीच कारकीर्द गाजवली. सध्या त्यांचे पुत्र नितेश राणे हे आपल्या बेधडक नव्हे तर बेताल वक्तव्यासाठी प्रसिध्द होत आहेत. बाळासाहेब ठाकरेंनंतर हिंदुहृदयसम्राट मीच काहीशा अशा अविर्भावातुन त्यांनी बकरी ईद, हलाल का झटका मटण असे अनावश्यक विषयाला हात घालुन अल्पसंख्याक समुदायाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांचे पक्षातील आका खुश असले तरी सध्या त्यांनी केलेल्या एका वक्तव्याने महायुतीत मिठाचा खडा पाडल्याचे चित्र आहे. धाराशिवमध्ये झालेल्या एका सभेत त्यांनी महायुतीतील मित्रपक्षांनाच तंबी देवुन कुणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसेही नाचले तरी सगळयांचा बाप म्हणुन भारतीय जनता पार्टीचा बाप म्हणुन मुख्यमंत्री बसलांय, अशा आशयाचं वक्तव्य केलं. तसं पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांना बाप म्हणण्याची ही त्यांची दुसरी वेळ, पुर्वी देखील सगळ्यांचा बाप सागर बंगल्यावर बसलांय म्हणुन त्यांनी वक्तव्य केलेलंच आहे. राणे पिता-पुत्रांना केवळ बोलायला ठेवलंय असाही आरोप काही विरोधक नेहमी करत असतात. मुळात राणे कुटूंबाला मिळालेली मंत्रीपदं सागर बंगल्यावरुन मिळालेली असल्याने त्यांना बाप म्हणण्यात त्यांना गैर वाटत नसेल मात्र मित्रपक्षांनीही फडणवीसांना बापं म्हणावं हा अट्टाहास का? मंत्रीमंडळ बैठकीत यावर नाराजी व्यक्त झाल्याची बातमी आहे. मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना शब्द जपुन वापरण्याबाबत सल्ला देवुन कोणाचाही बाप काढणं चुकीचं आहे अशी भुमिका मांडली. तर शिवसेना शिंदे गटाने आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण? अशी विचारणा केल्याची चर्चा आहे. यामुळे उध्दव ठाकरे जे बाप चोरल्याचं म्हणतात ते खरं असल्याचं आणि शिंदे गटाने ते मान्य केल्याचं या प्रकरणात सिध्द झालं. नितेश राणेंचे स्वत:चे बाप नारायण राणेंनीही याबाबत मुख्यमंत्री हा जनेतचा सेवक असतो तो कोणाचाही बाप नसतो अशी त्यांना समज दिली आहे. खरंतर राजकारणात प्रत्येकाला कोणाचा तरी आशिर्वाद असतो, पाठबळ असते. पण केवळ त्या राजकीय नेतृत्वाला खुश करण्यासाठी मित्रपक्षांचा बाप काढणे योग्य नाही. मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांच्याशीही सध्या राणे कुटूंबासोबत जुंपली आहे. नितेश राणे यांची उंची उभे राहिल्यावर लवंगएवढी आणि बसल्यावर विलायची एवढी, असा मिश्कील टोला लगावला होता. अर्थात हे विधान महाजन यांनी तेव्हा केले जेव्हा मनसेचे पक्षीय ‘बाप’ राज ठाकरेंवर राणेंनी टिका केली होती. नितेश राणेंविषयी राजकारणात कित्येक लोकं आजही ‘बाप माणूस’ म्हणुन ओळखली जातात त्या मानाने नितेश राणेंचा अनुभव कमी असल्याने त्यांनी शांतता पाळणे आवश्यक आहे. कारण शेवटी त्यांनी कुणाला जरी बाप म्हटले तरी प्रत्यक्षात बाप तो बाप रहेगा..!

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत