133 मृतदेह बाहेर काढल्याची माहिती
अहमदाबाद, 12 जून (वृत्तसंस्था) : गुजरातमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचं विमान कोसळल्याचं वृत्त समोर आलं आहे. या विमानात अनेक प्रवासी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या ठिकाणी विमान कोसळलंय तिथून धुराचे लोट निघत असल्याचं दिसत आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल झाला असून ही खूप मोठी दुर्घटना असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेत किती हानी झाली आहे हे अद्याप समजलेलं नाही.
हे विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळे मोठी हानी झाली असण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र त्याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे की या विमानात 242 प्रवासी होते. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट होऊन विमानाने पेट घेतला आहे. त्यामुळे ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात गाड्या व बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचं काम चालू आहे. बचावकार्यासाठी आपत्कालीन बचाव पथक देखील मेघानीनगरमध्ये दाखल झालं आहे. पाठोपाठ सीमा सुरक्षा दल व एनडीआरएफची पथकं देखील बचावकार्यासाठी रवाना झाली आहेत. एअर इंडियाने देखील या दुर्घटनेची पुष्टी केली आहे. मात्र, या अपघाताचं कारण स्पष्ट केलेलं नाही. रवासी विमानात 242 प्रवासी आणि कर्मचारी होते. त्यापैकी 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनेडियन नागरिक आणि 7 पोर्तुगीज नागरिक आहेत.
माहितीनुसार, विमानाच्या ढिगार्यातून आतापर्यंत 133 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मदत आणि बचाव कर्मचारी आग विझवण्याचे काम करत आहेत तसेच ढिगार्यात जखमी आणि मृतांचा शोध घेत आहेत.