बुलढाणा, ३० सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अतिवृष्टीच्या संकटात सापडलेला आहे. त्यामुळे सरकारकडून मदतीची घोषणा झाली आहे. परंतू अद्याप मदत पोहचू शकलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीचे मदत मिळाली पाहिजे यासाठी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे पुढे सरसावले आहे. मतदार संघात कुणाचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक मदत नेहमीच करीत असतात. यावेळी महाराष्ट्रावरचे संकट मोठे आहे. शेतातील पिके वाहून गेली, शेत जमिन खरडून गेली, गुन्हे ढोरे वाहून गेली व घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे त्यांना मदतीचा हात म्हणून आमदाराचे एका महिन्याचे मानधन दिले. आज आयोजित पत्रकार परिषदेत आ. गायकवाड यांनी बुलढाणा शहरातील त्यांचे सर्व्हे नं. ४४ मधील दोन प्लॉट विकून त्यामधून आलेली २५ लाख रूपये मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितले आहे की, ही मदत तात्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा. तसेच त्यांनी सर्वांना आवाहन केले आहे की, सर्व उद्योजक, अभिनेते, राजकीय पक्षातील पदाधिकारी, विविध प्रतिष्ठाने, सरकारी नोकरदार, पतसंस्था व इतरांनी मदत करण्यासाठी पुढे यावे कारण आज जगाचा पोशिंदा संकटात आहे. सरकारने पंचनामे पुर्ण करण्याचे आदेश दिले आहे. ती प्रक्रिया सुरू आहे. सरकारला शेतकऱ्यांना मदत करायची आहे. कर्जमाफी करण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे सांगितले. तसेच पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आ.गायकवाड यांच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत सरपंच देवा दांडगे यांनी एका वर्षाचे मानधन ५१ हजार रुपये दिले आहे. पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले पत्रकार राजेंद्र काळे यांनी त्यांच्या लेक प्रार्थनाचा वाढदिवस साजरा न करता २१ हजारांची मदत देण्याचे जाहीर केले आहे.
शिवसेना नेते विजय अंभोरे, गणेशसिंग राजपूत, अनुजाताई सावळे, जिजाताई राठोड यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.