शेगावात दर्शन घेत विजयराज शिंदेंनी फोडले प्रचारचे नारळ

बुलढाणा, ३ एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी/अजय काकडे): राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. राजकारण हा अनिश्चितेचा डाव आहे. कधी ऐकमेकांच्या सोबत हातात हात घालून चालणारे कधी एकमेकांच्या विरोधात उभे राहतील हे सांगता येत नाही. आज ज्याचं काम केल तर उद्या तो आपल्या उपकराची जाणीव ठेवेलच याची शाश्वती राजकारणात नसते. माजी आमदार तथा बुलढाणा भाजपा लोकसभा प्रमुख विजयराज शिंदे आणि खा. प्रतापराव जाधव यांच्यातील राजकीय वैर तसं जुनंच.. २०१४ पासून या दोघांमध्ये शिवसे नेत असतांनाच शीतयुध्द सुरू होते. यांच्या बॅनरवर त्यांचा फोटो नसायचा तर त्यांच्या बॅनरवर यांचा फोटो नसायचा.. नेहमीच ऐकमेकांविरोधात कुरघोडीची संधी सोडली नाही. मोदींना एक खासदार कमी मिळाला तरी चाललं पण खा. प्रता- परावांना पाडायचं असा निर्धारच त्यांनी केलेला दिसतो. कारण ‘नवरा मेला तरी चाललं पण सवत विधवा झाली पाहिजे’ या म्हणीला साजेस राजकारण बघायला मिळत आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणूकींच्या दरम्यान युवासेना नेते आदित्य ठाकरे हे ‘जन आशिर्वाद यात्रा’ घेऊन बुलढाण्यात आले तेव्हा त्यांच गांधी भवना जवळ स्वागत करण्यात आले पण तिथे विजयराज शिंदे उपस्थित नव्हते. त्यांनी येळगावला आदित्य ठाकरेंच्या यात्रेचे स्वागत केले. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीच्या उमेदवारी वरून चांगलच वातावरण तापलं होत. धीरज लिंगाडे, मधुसुदन सावळे, जालिंधर बुधवत, संजय गायकवाड यांनी विधानसभेसाठी आमच्या पैकी कुणालाही उमेदवारी द्या पण विजयराज शिंदेंना देऊ नका अशी भूमिका घेतली होती. ज्यावेळी उमेदवारांना एबी फॉर्म देण्याची वेळ आली तेव्हा खा. प्रतापराव जाधव यांनी परंपरा तोडत एबी फॉर्म स्वतःच्या ताब्यात घेत आ. संजय गायकवाड यांना दिला. विजयराज शिंदे हेही एबी फॉर्म मिळविण्यासाठी मातोश्रीवर उपस्थित होते. पण त्यांना तिथेपर्यंत पोहचता आले नाही. याचे शल्य त्यांच्या मनात नेहमीच घर करून राहत आहे. खा. जाधवांनी आपल्या तोंडचा घास हिसकावून घेतला असल्याने त्यांना आपण मदत कशी करायची ही भुमिका त्यांच्या मनात आल्यामुळेच त्यांनी महायुतीचा उमेदवार जाहिर झाल्यानंतरही आपला उमेदवारी अर्ज भरला. ते अर्ज मागे घेणार नाही असा विश्वास जिल्ह्यातील राजकीय जाणकार व्यक्त करत आहे. कालच महायुतीच्या सभेनंतर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विजयराज यांना त्यांची औकात कळून जाईल अशी खोचक टिका केली. तर आ. संजय गायकवाड यांनीही माध्यमांशी संवाद साधतांना सांगितले की, विजयराज शिंदे यांनी २००४ च्या लोकसभेपासूनच पक्षाच्या उमेदवाराला त्यांनी मदत केलेली नाही. ते काही दिवसापूर्वी शिवसेना उबाठाची उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेना नेते दिवाकर रावते यांना भेटून आले पण त्यांना तिथे उमेदवारी मिळाली नसल्याने त्यांनी अर्ज भरला आहे. भाजप हा शिस्तप्रिय पक्ष असल्याने विजयराज शिंदे यांच्यावर कारवाई होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. विजयराज शिंदे हे आमदार असतांना त्यांनी बुलढाण्यात भाजपला मोठे होऊ दिल नाही. आता त्यांचे भाजप प्रेम हा फक्त देखावा असल्याचे मत सुद्धा गायकवाड यांनी व्यक्त केले. खासदार झालो नाही तरी चालेल पण ज्यांनी विधानसभेत जाण्यापासून रोखले त्यांना संसदेत जाऊ द्यायचे नाही असे एकंदर माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या भुमिकेवरून दिसत आहे. विजयराज शिंदे हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील की कायम ठेवतील हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल.