बुलढाणा, १६ ऑगस्ट (वृत्तसंस्था) : मागील आठवड्यात कोलकाता येथील शासकीय रुग्णालयात कार्यरत डॉक्टर महिलेवर अतिशय क्रूरपणे लैंगिक अत्याचार करून तिची निघृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचे संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरात तिव्र पडसाद उमटत आहे. आयएमए तर्फेही देशभरात निदर्शने आणि कँडल मार्च काढण्यात आले आहेत. इंडीयन मेडीकल एसो. च्या बुलढाणा जिल्हा शाखेच्या पुढाकाराने इतर सर्व मेडीकल संघटनांच्या सहभागाने उद्या, १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता बुलढाणा शहरात निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. तर उद्या संध्याकाळी ७ वाजेदरम्यान महिला संघटनांच्या वतीने कँडल मार्च काढण्यात येईल. जयस्तंभ चौकापासून कँडल मार्च सुरु होवून हुतात्मा स्मारकावर त्याचा समारोप होईल. दोन्ही आंदोलनामध्ये संवेदनशील बुलढाणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आर जी कार महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी गुन्ह्याची परिस्थिती अतिशय हलगर्जीपणे, निष्काळजीपणे हाताळली असल्याचा आरोप डॉक्टर संघटनांनी केला आहे. पंधरा ऑगस्टला मोठ्या जमावाने या रुग्णालयाच्या विविध विभागांची फक्त तोडफोडच नाही केली तर ज्या सेमिनार रुममध्ये पिडीत निवासी डॉक्टर चा निघृण बलात्कार व हत्या केली गेली तेथले पुरावेही नष्ट करण्याचा प्रयत्न ह्या जमावाने केला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवरही हल्ला केला. एवढे अपुरे होते की काय भरती असलेल्या रुग्णांना तसेच भरती रुग्णांसाठी लागणाऱ्या साधनसामग्री ला सुध्दा प्रचंड मोठी क्षती पोहोचविली. डॉक्टर्स विशेषतः स्त्री डॉक्टर्स हिंसाचाराला वारंवार बळी पडतात. रुग्णालये आणि कॅम्पसमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेची तरतूद करणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे. मात्र डॉक्टर्स च्या सुरक्षेबाबत संबंधित ह्या अधिकाऱ्यांच्या उदासीनता आणि असंवेदनशीलतेमुळेच डॉक्टर्स, • परिचारिका आणि इतर आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांवर वारंवार शारीरिक हल्ले होतात, रुग्णालयामध्ये राडे होत राहतात. कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमधील स्त्री निवासी डॉक्टर वर झालेल्या क्रूर गुन्हेगारी आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलक विद्यार्थ्यांवर उधळलेल्या गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर, इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवारी १७.८.२०२४ निषेधदिन पाळून सकाळी ६ वाजेपासून ते रविवार १८.८.२०२४ सकाळी ६ वाजेपर्यंत २४ तासांसाठी आधुनिक वैद्यकशास्त्राच्या डॉक्टरांच्या (लोपॅथी) देशव्यापी सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. सर्व अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवल्या जातील. अपघातग्रस्तांना आकस्मिक सेवा दिली जाईल. परंतु नियमित ओपीडी कार्य करणार नाहीत आणि वैकल्पिक, तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रियाही केल्या जाणार नाहीत. ज्या ठिकाणी आधुनिक वैद्यक डॉक्टर्स सेवा देत आहेत त्या सर्व क्षेत्रांमधील सेवा २४ तासांसाठी बंद राहतील.