वाढविला जनसंपर्क अन् भेटी-गाठी, जो-तो उत्सुक तिकीटासाठी !!
बुलढाणा, 5 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) :- यावेळेस बुलढाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात दोन-दोन ईव्हीएम मशीन लावण्याची गरज भासते की काय, अशी परिस्थीती आहे. दिवसागणीक विधानसभा लढणार्यांच्या संख्येत वाढ होत आहे. जे संवैधानिक दृष्ट्या पात्र असतील ते लढू शकतीलच कारण ही लोकशाही आहे.. परंतु डफडं वाजलं की अंग हलविणारे आणि ऐनवेळी निवडणूक लढण्यासाठी सज्ज होणारे, यात जास्त फरक नाही. जे अहोरात्र जनतेत आहे, त्यांच्या समस्यांशी समरूप आहेत आणि ज्यांना राजकीय पींड आहे, अशांनी निवडणूक लढण्याची तयारी दर्शविली तर कुणालाही अप्रुप वाटत नाही. त्यामुळेच बुलढाणा विधानसभेच्या आखाड्यात 3 शेळके आणि 3 सावळेंच्या उतरण्याची चर्चा जोर धरून आहे. ही सहाही नांवे राजकारणाच्या पटलावर आपला ठसा उमटवून असल्यामुळे अनेकांचे लक्ष यांच्या पुढील वाटचालीकडे टिकून आहे.
शेळके नांव उच्चारलं की, आधी जयश्रीताई यांचे नांव आपसूकच येते. शिव-फूले-शाहू-आंबेडकर विचारधारेला समर्पीत होवून चळवळीतून जयश्रीताई शेळके यांच्या राजकीय आयुष्याचा प्रारंभ झाला आहे. मराठा सेवा संघाच्या चळवळीत जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून राज्यभर पुरोगामी विचारधारेची पेरणी करण्यात त्या आघाडीवर होत्या. त्यांनी या चळवळीत स्वतःला एव्हढं वाहून घेतले होते की, सन 2009 च्या विधानसभा निवडणूकीत जय-पराजयाची चिंता न करता त्या शिवराज्य पार्टीकडून उमेदवार म्हणून लढल्या. पराभवाची कारणे अनेक होती. त्यानंतरही त्यांनी चळवळीचा धागा तुटू दिला नाही. काँग्रेसमध्ये प्रवेश करीत त्यांनी नव्या राजकीय इनिंगला सुरुवात केली. साखळी जिल्हा परिषद सर्कलचे तिकीट मिळाले. खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवूनही त्या बुलढाणा तालुक्यातून मताधिक्क्यात आघाडीवर राहिल्या. 15 वर्षांपासून इतरांकडे असलेले साखळी जिल्हा परिषद सर्कल काँग्रेसकडे खेचण्यात जयश्रीताई शेळके यशस्वी ठरल्यात. 2014 पासून त्या पक्षाकडे तिकीटाची मागणी करीत आहेत. 2014 मध्ये तिकीटाच्या लढाईत निष्प्रभ असलेल्या जयश्रीताई 2019 मध्ये आघाडीवर होत्या. आता 2024 च्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या यादीत त्यांचे नांव अग्रणी आहे. विशेष म्हणजे काही अंतर्गत सर्वेक्षणातही त्या इतर संभाव्य उमेदवारांपेक्षा सरस असल्याचे समजते.
जयश्रीताई शेळके यांना तिकीट मिळेल की नाही, माहीत नाही. परंतु त्यांचे सख्खे दिर संदीप शेळके यांच्या रुपात कुटूंबातूनच तगडे आव्हान मिळत असल्याचे दिसून येत आहे. वन मिशन बुलढाणाचा उद्घोष करीत संदीपदादांनी नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक लढली. परंतु ‘डिपॉझीट’ वाचेल, एव्हढीही मते त्यांना मिळू शकली नाही. पहिल्यांदा निवडणूक लढणे आणि त्यातही अपक्ष म्हणून सामोरे जाणे, या दोन्ही बाबतीत त्यांना मोठी उर्जा खर्च करावी लागली. आता त्यांच्याकडे निवडण्ाूक लढण्याचा अनुभव आहे आणि त्यांनी ‘हवा का रूख’ पाहता शिवसेना उबाठा गटात प्रवेश घेतला आहे. त्यांचे समर्थक संदीपदादांना भावी उमेदवार म्हणून बघत आहेत. अर्थात उबाठामधून जालींधर बुधवत बर्याच दिवसापासून कामाला भिडलेले आहेत. मिळो अथवा न मिळो, तिकीट मागू, अशी भूमिका संदीपदादा यांची आहे. स्वतःसाठी शक्य झाले नाही तर ते पत्नी मालतीताई शेळके यांच्यासाठीही जोर लावण्याच्या तयारीत असल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांच्याकडे ते कशाप्रकारे आपली फिल्डींग लावतील, हे आपल्याला समजणार नाही. मध्यंतरी जयश्रीताई उबाठाच्या तिकीटासाठी प्रयत्नशील होत्या. उद्धव ठाकरे यांनी जयश्रीताईंना ‘आता शक्य नाही, पुढे बघू’, असा संदेश देत लोकसभेच्या वेळी उबाठा उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या पाठीशी राहण्याची विनंती केली होती. पण संदीपदादा शेळके उबाठात गेल्यामुळे आपोआपच जयश्रीताईंसाठी उबाठाचा दरवाजा आतून बंद झाला असल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे.
आता तिसरे शेळके कोण ? याचे उत्तर नरेश शेळके आहे. जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक रूचि असणार्या नरेश शेळके यांना 2014 मध्ये विधानसभा निवडणूक लढण्याचा अनुभव आहे. परंतु राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यापासून त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. महाविकास आघाडीकडून बुलढाण्याची जागा शरद पवार राष्ट्रवादी गटाला सुटली तर नरेश शेळके यांच्याशिवाय दूसरे कुठले नांव पक्षाला तुल्यबळ वाटणार नाही. शिवसेना पक्षात 1994 मध्ये राजकारणाला प्रारंभ करणार्या नरेश शेळके यांनी अल्पावधीतच उपतालुकाप्रमुख, नंतर तालुकाप्रमुख पदापर्यंत मजल मारली होती. परंतु अंतर्गत गटबाजीतून त्यांना पक्ष सोडावा लागला. चार वर्षांपर्यंत ते पक्षात स्वाभिमानासाठी संघर्ष करीत राहीले. शेवटी डॉ. राजेंद्र शिंगणेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीमध्ये गेले. सुरुवातीला राष्ट्रवादीने शेळकेंना सांभाळले आता 19 वर्षांपासून नरेश शेळके राष्ट्रवादीला सांभाळत आहेत. 2007 ला जिल्हा परिषद सदस्य झाले. 2012 ला पुन्हा त्यांना जिल्हा परिषदेत विजयश्री मिळाली. त्यांच्या पत्नी लक्ष्मीताईंना जि.प. कृषी सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी चांगलाच नावलौकिक मिळविला. नरेश शेळके यांच्यातील नेतृत्वगुणांमुळे शरद पवारांनी त्यांना 2014 च्या विधानसभा निवडणूकीत उतरविले. परंतु ते पराभूत झाले. त्यानंतर आलेल्या जिल्हा परिषद निवडणूकीत त्यांच्या पत्नी लक्ष्मीताई पराजित झाल्या. राष्ट्रवादीत दोन गट झाल्यानंतर ‘शिलेदार निष्ठेचे’ म्हणून शेळके यांनी मोठ्या साहेबांची साथ सोडलेली नाही. आता ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. जर 2014 सारखं सगळेच पक्ष वेगवेगळे लढले तर शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून नरेश शेळके यांचे नांव अग्रक्रमाने पुढे येईल, यात शंका नाही.
‘सावळे’ नावातच वेगळा दम आहे.. तो धृपदराव सावळे यांच्यामुळे ! 1999 मध्ये विजयराज शिंदे यांना हरवून काँग्रेसचे आमदार बनलेले धृपदराव आपल्या धडाकेबाज कारकीर्दीसाठी प्रसिद्ध होते. सरपंचपदापासून जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नंतर आमदारकी भूषविल्यामुळे धृपदराव सावळे यांची गावोगावी नाळ जुळलेली होती. परंतु वासनिकांशी खटकल्यामुळे 2004 च्या विधानसभेत रनिंग आमदार असतांनासुद्धा त्यांचे तिकीट कापले गेले होते. त्यावेळी त्यांनी तत्कालिन काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात मोर्चेबांधणी करून आपली ताकद दाखवून दिली होती. ‘पक्षाला माझी गरज आहे’, हे सिद्ध करण्यात ते यशस्वी ठरल्यामुळे 2009 मध्ये त्यांना पुन्हा विधानसभेची उमेदवारी दिली गेली. परंतु ते पराभूत झालेत. नंतर 2014 च्या निवडणूकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर चिखली विधानसभा निवडणूक लढविली. त्याठिकाणी त्यांचा दारूण पराभव झाला. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपची चलती पाहून भाऊंनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये ते थेट जिल्हाध्यक्ष बनलेत. परंतु 2019 च्या निवडणूकीत त्यांनी तिकीटासाठी प्रयत्न केलेत. परंतु शिस्तबद्ध भाजपने त्यांना थांबविले. आता मात्र 2024 मध्ये ते थांबायला तयार नाहीत.
दूसरे सावळे म्हणजे डॉक्टर मधुसूदन सावळे.. तेच ज्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील प्रतिभाशाली लोकांना नवरत्न पुरस्कार देवून सातत्याने गौरवान्वित केलेले आहे. शिवसेनेतून काँग्रेस आणि पुन्हा घरवापसी करीत डॉ. मधुसूदन सावळे सुद्धा विधानसभा निवडणूकीची तयारी करीत आहे. पक्षाने दिले तिकीट, मग कशाची किटकिट ! असे त्यांचे धोरण आहे. शिवसेनेतील बंडानंतर अनेक जण शिंदे गटाकडे गेले. परंतु आपली निष्ठा एकमेव उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे सांगत त्यांनी उबाठा निवडली. आता ते गावोगावी दौरे करीत आहेत. जनसंपर्काची एकही संधी ते सोडत नाहीत. उच्चविद्याविभूषित असल्यामुळे डॉ. मधुसूदन सावळे यांच्याविषयी समाजात आदर आहे. सोनोग्राफी तज्ञ असलेले डॉ. सावळे राजकीय सोनोग्राफी करतांना नेहमी मागे पडतात, हे तितकेच खरे आहे. यावेळेस मात्र तिकीटाची संधी सोडायची नाही आणि पूर्ण ताकदीन निवडणूक लढवायची, असा निर्धार त्यांनी केलेला आहे. संस्कृति आणि सभ्यता असे दोन सद्गुण त्यांच्याकडे आहे. पण पॉलिटीकली फिल्डींग कशी लावायची, याबाबत ते अनभिज्ञ असतात. उबाठा कडून शेवटच्या क्षणी डॉ. मधुसूदन सावळे यांची ‘लॉटरी’ लागू शकते, असे त्यांच्या समर्थकांना वाटते.
बुलढाण्यासारख्या छोट्याशा शहरात महामहिम राष्ट्रपतिंना आणण्याची ऐतिहासिक कामगिरी अॅड. विजय सावळे यांच्या नावावर आहे. याशिवाय नुकतेच नव्या जिल्हा न्यायालयाच्या ईमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीसह 16 न्यायमूर्ती आणि न्यायाधीश बुलढाण्यात येवून गेले. याचेही श्रेय अॅड. सावळे यांनाच… बुलढाणा जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष म्हणून ते नेहमी निवडून येतात. परंतु त्यांचा मूळ पिंड राजकारणाचा आहे. नाागपूरला 1987 साली लॉ कॉलेजला असतांना सेक्रेटरी म्हणून नंतर अध्यक्ष म्हणून अॅड. विजय सावळे निवडून आले होते. नंतर त्यांनी विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व केले. विशेष म्हणजे नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, सिनेट मेंबर म्हणूनही त्यांना सन्मान मिळाला. अशा चुणूकदार आणि अभ्यासू विद्यार्थ्याला काँग्रेसने एनएसयुआयचे प्रदेश उपाध्यक्ष बनविले होते. 1997 मध्ये युवक काँग्रेस प्रदेश महासचिव आणि नंतर ते बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यकारी सदस्य झाले. 1995 पासून ते पक्षाकडे जिल्हा परिषद आणि विधानसभेचे तिकीट मागत आहेत. ते तिकीटाच्या शर्यतीत असतात परंतु ऐनवेळी ते मागे पडतात. यावेळेस मात्र काँग्रेसचे जिल्हा सर्वेसर्वा मुकूल वासनिक आणि काँग्रेसपक्ष आपला विचार करेल, हा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
अशाप्रकारे बुलढाणा विधानसभेच्या संभाव्य निवडणूकीत संभाव्य उमेदवार म्हणून तीन सावळे आणि तीन शेळके उत्सुक असल्याचे चित्र आहे. तीन शेळके, तीन सावळे, निवडणूकीसाठी तयार सगळे परंतु तिकीट कुणा मिळे, हे इतक्या लवकर ना कळे !