प्रशासनापुढे हतबल होऊन सरपंचाची राजीनाम्याची तयारी
बुलढाणा, १२ सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी): देशात सत्तेचे विक्रंद्रीकरण करण्यात आले आहे. यामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकार आणि पंचायत राज व्यवस्था देशात अस्त्विात आहे. सर्वात शेवटचा घटक व ग्रामविकासाचा कणा म्हणजे ग्रामपंचायत आहे. याच ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामविकासाचे स्वप्न साकर केले जाते. परंतू लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनधीचेच जर प्रशासन ऐकत नसेल तर कसे ग्रामविकासाचे स्वप्न पुर्ण होईल? देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण झाली पंरतू आज बुलढाणा जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावे प्रशासनाच्या आडमुठेपणाच्या भुमिकेमुळे मुख्य प्रवाहात येऊ शकले नाही. कुंवर देव गट ग्रामपंचायतचे जनतेतून निवडून आलेले सरंपच जुमानसिंग मुजालदा यांनी अनेकवेळा प्रशासनाकडे रस्त्याच्या व इतर सोयी सुविधासंदर्भात पाठपुरावा केला पंरतू प्रशासनाकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. सरपंचाचा फोन अधिकारी सोडा ग्रामसेवक घेत नाही. गेल्या आठवड्यात साथ रोगाच्या प्रादुर्भावामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. या घटना थांबवू न शकल्यामुळे तसेच मुलभुत सोयी सुविधांसाठी पाठपुरावा करून ही प्रशासन जुमानत नसल्यामुळे हतबल होऊन सरपंच जुमानसिंग मुजा लदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. त्यांनी तो राजीनामा अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द केला होता. हा जुमानसिंग मुजालदा यांचा प्रमाणिकपणा की त्यांनी जबाबदार स्विकारली परंतू गेंड्याची कातडी असणाऱ्या प्रशासनाला जाग येणार नाही. कारण ज्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. त्यांना कसली जाग येणार, २०१३ साली तात्कालीन अमरावती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषेदचे मुख्यकार्यकारी अधिकारी हे या गावात मुक्कामी राहुन सर्व समस्या जाणून घेतले. परंतू आज याला ११ वर्षपूर्ण झाली तरी प्रशासनाकडून फार काही हालचाली झाल्या नाही. वन खात्याच्या आत्यारीत हा भाग येत असल्याने वन प्रशासन येथे रस्ता होऊ देत नाही. गोमाळ या गावाला महसुली दर्जा प्राप्त नसल्याने तिथे पाणी पुरवठ्याच्या योजना नेता येऊ शकत नाही. पण यामधून मार्ग काढला जाऊ शकतो. पण व्यवस्थेची तयारीच दिसून येत नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेले गोमाळ या अदिवासी गावात गेल्या आठवड्यात गावाच्या परिसरात साथ रोगाने थैमान घातले. यामध्ये तीन जणांचा उपचारा आभावी मृत्यू झाला. आजारी पडल्यानंतर रूग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी कुठलीच वाहतूक व्यवस्था नाही. जंगल- ातून पाऊल वाटेने तब्बल आठ किलोमीटर चालत जावे लागते. ६ सप्टेंबर रोजी गोमाळ गावातील एक १७ वर्षीय मुलीला झोळीत बांधून उपचारासाठी आठ किलोमीटर दऱ्या खोऱ्यातून पायपीट करत भिंगाऱ्यापर्यंत आणले परंतू वेळेत उपचार न मिळू शकल्यामुळे त्या मुलीचा मृत्यू झाला. उपचारा आभावी तीन जणांचा जो मृत्यू झाला हे प्रशासनाच्या हालगर्जीपणाच म्हटला तर यात काही वावगे नाही. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे. यातून तरी प्रशासन जागी होईल की अजून सुस्तच राहिल याबाबत येणाऱ्या कालावधीत दिसून येईल.