‘बुलढाण्याच्या आमदाराने माझ्याशी खेटू नये.. अन्यथा ’ :- हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
‘काँग्रेसच्या एकही कार्यकर्त्याला वार्यावर सोडणार नाही’ :- अॅड. जयश्रीताई
बुलढाणा, 7 नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी/ रणजीतसिंग राजपूत) :- अखेर हर्षवर्धन सपकाळ आणि अॅड. जयश्रीताई शेळके यांच्यात ‘मनोमिलन’ घडून आले. ‘ताई’ आणि ‘दादां’च्या या दिलजमाईनंतर गर्दे वाचनालयाच्या सभागृहात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अलोट गर्दीने भरलेल्या मेळाव्यात आज आ. धीरज लिंगाडे तसेच उबाठाचे प्रा. नरेंद्र खेडेकर, जालींधर बुधवत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. गणेश पाटील ,अॅड. विजय सावळे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची वज्रमुठ आणखी आवळल्या गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. तत्पूर्वी ‘महाविकास आघाडीच्या धोरणामुळे काँग्रेसचे भविष्यात मरण होवू नये’, अशी अपेक्षा काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली होती. त्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवार अॅड. जयश्रीताई शेळके यांनी शब्द दिला की, मागील 12 ते 15 वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांचा माझ्यावर हक्क आहे.. या हक्काला डावलण्याचा प्रयत्न जर माझ्याकडून झाला तर मला खाली खेचण्याचा अधिकार तुम्हांला राहील.’.
आज, सर्वांच्या नजरा सपकाळ यांनी आयोजित केलेल्या काँग्रेस मेळाव्यावर खिळून होत्या. त्याचे कारण म्हणजे जयश्रीताईंच्या उमेदवारीला घेवून सपकाळ नाराज असल्याच्या चर्चा वेगाने पसरल्या होत्या. 29 ऑक्टोबर रोजी जयश्रीताईंनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यादिवशी सपकाळ कुठेही दिसले नाहीत. सपकाळ यांचे समर्थकही ताईंच्या प्रचारात सहभागी नव्हते. दूसरीकडे सपकाळ यांनी 7 नोव्हेंबर रोजी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आणि महाविकास आघाडीला हादरा बसला. या मेळाव्यातून सपकाळ कुठली भूमिका घेणार, याची चर्चा सुरु झाली होती. सपकाळ विरोधी गटाला ‘मॅनेज’ झाल्या, या चर्चांनाही उधाण आले होते.

परंतु आज मेळाव्यातून हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट सांगितले की, मला मॅनेज करणारा अजून जन्म घ्यायचा आहे.. काँग्रेस पक्षाशी आजन्म निष्ठा असणारा मी कार्यकर्ता आहे. लोकसभा आणि विधानसभा दोन्ही ठिकाणी काँग्रेसला उमेदवारी मिळाली नाही, याचे शल्य आहे. याठिकाणची काँग्रेस जीवंत राहावी म्हणून प्रयत्नशील होतो आणि राहील. मात्र याचा अर्थ असा नाही की, महाविकास आघाडी सोडून इतर कुणाचेही आम्ही काम करू.. म्हणून याठिकाणी पूर्ण ताकदीनिशी महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही उमेदवारापेक्षाही हातभर पुढे राहू, अशी ग्वाही सपकाळ यांनी दिली.
‘काही जण काँग्रेसचे असून महाविकास आघाडीचे नेते वाटतात.. काही उबाठाचे असून काँग्रेससाठी काम करतात. अशी छुपाछुपी पक्षासाठी योग्य नसल्याचे सांगत सपकाळ यांनी आपली खंत व्यक्त केली. यापुढेही निवडणूका आहेत.. त्या कार्यकर्त्यांच्या आहेत.. त्या प्रक्रियेत सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय होवू नये म्हणून मेळावा घेवून भूमिका घेतली, असे सपकाळ म्हणाले. ‘काँग्रेसचा सन्मान राखला गेला पाहीजे.. येणार्या निवडणूकांमध्ये काँग्रेसला योग्य प्रतिनिधीत्व मिळाले पाहीजे.. आमच्यावर पश्चातापाची वेळ येवू नये’, या परखड शब्दांत सपकाळ यांनी कार्यकर्त्यांच्या भावना जयश्रीताई आणि इतर नेतेमंडळींसमोर मांडल्या.
आ. संजय गायकवाड यांचे नांव न घेता हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मागील अनेक दिवसांपासून मी खूप काही बोलत आहे.. गुंडा म्हटले, त्यांच्या कार्यालयाला अड्डा म्हटले, खंडणीखोर, छपरी, असे खूप काही बोललो.. पुतळ्याचे विषय घेतले, अवैध व्यवसायावर बोललो.. पण आमदार महोदय माझ्यावर बोलतच नाही.. मला कशाची भिती नाही.. पण जर माझ्याशी खेटाल तर योग्य शब्दांत उत्तर देवू’, असा इशाराही माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.
भाषणादरम्यान गर्दीचा प्रतिसाद आणि प्रेम पाहून जयश्रीताई गहिवरल्या. आपल्या मनोगतातून अॅड. जयश्रीताई शेळके यांनी बुधवत यांनी केलेल्या त्यागाचा उल्लेख केला. जसे जालींधरभाऊ माझ्यामागे उभे राहिले, तसे बंटीदादाही मोठ्या भावाप्रमाणे मला आशिर्वाद देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘तुमच्या सर्वांच्या भावनांचा मी आदर करते.. कुणावरही अन्याय होवू देणार नाही.. आपण सर्व माझ्यासोबत आहात, याचा आनंद अवर्णनीय आहे. मी तुमचे ॠण आजन्म विसरणार नाही’, या शब्दांत जयश्रीताईंनी आपल्या संवेदना प्रकट केल्या.
सपकाळ समर्थक अनेकांनी यापूर्वी भाषणे केली. त्यात काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता काकस यांनी बुलढाण्याच्या आमदारांना दिलेले आव्हान लक्षवेधी ठरले. ‘आम्ही दादांसोबत आहोत.. बुलढाण्यातील विकृतीला गाडण्यासाठी ताईंना निवडून आणू’, अशी गर्जना काकस यांनी केली. अॅड. गणेश पाटील यांनीही समायोचित विचार व्यक्त केले. एकंदरीत काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये असलेली धुसफूस, नाराजी, राग हे सर्व आजच्या मेळाव्यात निवळलेले दिसले. आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे हर्षवर्धन सपकाळ हे विरोधकांना ‘मॅनेज’ आहेत, या वावड्यांना तिलांजली मिळाली.