बुलढाणा, 13 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) : अजिंठा डोंगररांगेचा भाग असलेल्या गिरडा बीटमध्ये पाणी नसल्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे भटकंती करताना दिसत आहे. गिरडा येथे पाण्यासाठी व्याकूळ झालेलं हरण सर्वत्र पाण्याचा शोध घेत होते. परंतु या हरणाला कुठेच पाणी मिळाले नाही. शेवटी एका शेतातील विहिरीत पाणी दिसले हरणाने पाणी पिण्यासाठी विहिरीत उडी घेतली. परंतु यामध्ये हरणाचा मृत्यू झाल्याची घटना घटना आज 13 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गिरडा शिवरात शेतकरी दिलीप गायकवाड यांच्या शेतात विहीर आहे. पाण्यासाठी तहानलेल्या हरणाने कुठेच पाणी दिसून येत नसल्याने विहिरीत उडी घेतली व पाणी पिऊन बाहेर येता येत नसल्याने आपला जीव गमावला. गिरडा सारख्या अजिंठ्याच्या डोंगररांगांचा भाग असलेल्या जंगलात वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करणे अपेक्षित आहे. परंतु त्या दृष्टीने वनविभागाने पावले उचल्याचे दिसून येत नाही. एप्रिल महिन्यात बुलढाणा जिल्ह्यातील तापमानचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर जात आहे. उष्णता वाढत असल्यामुळे जीव पाणी पाणी करत असताना सुध्दा वनविभाग अजूनही गाढ झोपेत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे तात्काळ वनविभागाने याची गंभीर दखल घेऊन पाणवठे तयार करून त्यामध्ये वन्यजीवांसाठी पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शिवसेना विभागप्रमुख राजेंद्र गायकवाड, विशाल गायकवाड, गजानन गायकवाड व वन्यप्रेमींनी केली आहे.



